Wednesday, July 30, 2014

बारावीनंतर घ्या सरकारी नोकरी

सरकारी नोकरी मिळवणं हे आजही अनेक मराठी मुलांसाठी एक स्वप्न असतं. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भरती होत असते. याबाबतच्या जाहिराती वेळोवेळी निघत असतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी भरती केली जाते. यासाठी कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशन २०१४ ची जाहिरात नुकतीच प्रकाशित झाली आहे. वरील पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना काही वर्षांनी विभागीय परीक्षा देऊन उच्च पदावर अधिकारी म्हणूनही कामाच्या संधी उपलब्ध होतात .

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी

वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे.

प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत : १९ ऑगस्ट २०१४

परीक्षा फी : १०० रुपये ( महिला तसेच एस.सी., एस.टी. व अपंग उमेदवारांना फी नाही )

परीक्षा दिनांक - २ व ९ नोव्हेंबर २०१४

विद्यार्थी प्रवेश अर्ज संबंधित विभागीय ऑफिसमध्ये अर्ज पाठवू शकतात किंवा ऑनलाइन अर्ज भरू शकतात . परीक्षेसाठी केवळ एकच अर्ज पाठवावा. महाराष्ट्राचे विभागीय केंद्र मुंबई येथे असून परीक्षा केंद्रे औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , नागपूर , पुणे , नाशिक , अमरावती येथे आहेत .

निवड प्रक्रिया -

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्कील टेस्ट (डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी), टायपिंग टेस्ट (लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी) द्वारे केली जाते

लेखी परीक्षा-

लेखी परीक्षा २०० गुणांची असून प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. कालावधी २ तासांचा असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध असतील. लेखी परीक्षेत चार विषयावर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात.

विषय

१)सामान्य बुध्दीमापन २) इंग्रजी भाषा ३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटयुड ४) सामान्य ज्ञान

स्कील टेस्ट-

डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी स्कील टेस्ट घेतली जाते. लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावले जाते. स्कील टेस्टमध्ये १५ मिनिटे इंग्रजी भाषेत टायपिंग करायला सांगितले जाते. टायपिंगचा वेग तासाला ८००० की डिप्रेशन इतका असणे आवश्यक आहे. या टेस्टमध्ये केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी वेगळे गुण दिले जात नाहीत.

टायपिंग टेस्ट -

लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना टायपिंगच्या परीक्षेसाठी बोलावले जाते. टायपिंग टेस्ट हिंदी किंवा इंग्रजी भाषेत घेतली जाते. इंग्रजी भाषेतल्या टायपिंगचा वेग ३५ शब्द प्रती मिनिट तर हिंदी भाषेतील टायपिंगचा वेग ३० शब्द प्रति मिनिट इतका असणे आवश्यक आहे. टायपिंगची परीक्षा संगणकावर घेतली जाते यामध्ये १० मिनिटे दिलेल्या उताऱ्याचे टायपिंग करायचे असते.

या परीक्षेच्या अधिक माहितीसाठी http://ssc.nic.in ही वेबसाईट पहावी.

रिटेलचा भाव वधारलाय Career Jobs in Retail Industry


रिटेल इंडस्ट्री ही आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनलीय. अधिकाधिक किफायतशीर दरांमध्ये वस्तू मिळत असल्याने आपोआपच मॉल्स, मोठमोठाल्या स्टोअर्सकडे ग्राहकांची पावलं वळताना दिसतायत. त्यामुळे रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत.

आजच्या काळात रिटेल इंडस्ट्रीचा खूप झपाट्याने विकास होतोय. एक 'हॅपनिंग' उद्योगक्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जातंय. रिटेल इंडस्ट्री ही आज प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनली आहे. या क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणामुळे ग्राहकांना कमीतकमी किंमतीत दर्जेदार वस्तू मिळतात. अनेक मॉल्स, स्टोअर्सकडून खरेदी केलेल्या वस्तूंची घरपोच डिलिव्हरी मिळते. उत्तम सेवा, एक व्यावसायिक दृष्टिकोन असणारं हे क्षेत्र म्हणूनच आज ग्राहकांना, सर्वसामान्यांना आपलंसं वाटू लागलं आहे. मनाजोगती खरेदी आणि तुलनेने वाजवी किंमत यामुळे मॉल्स अर्थात या रिटेल इंडस्ट्रीचा भाव वधारला आहे.

कामाचं स्वरुप :

या क्षेत्रात विविध पदांवर काम करावं लागतं. एक्झिक्युटिव्ह किंवा ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात करताना स्टोअरच्या विविध विभागांत काम करावं लागतं. इथल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करून विक्री, मार्केटिंग आणि व्यवस्थापकीय कौशल्य विकसित होत जातात. मात्र, इथे काम करताना खूप तास काम करण्याची तयारी ठेवायला हवी. रिटेल मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळताना सलग अनेक तास काम करणं अपेक्षित असतं. कामाचा ताण सहन करायची तुमची तयारी हवी. याशिवाय, वीकेंडला प्रचंड संख्येने येणार्या ग्राहकांना सांभाळणं जमलं पाहिजे. खूप तास काम आणि कामाचा ताण हा वीकेंडला अधिक असतो. रिटेल स्टोअर्स सकाळी लवकर सुरू होतात आणि रात्री उशिरा बंद होतात. रविवारी आणि बँक हॉलिडे म्हणजे सुटीच्या दिवशीसुद्धा काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तसंच, दिवसभर उभं राहून काम करावं लागतं. यासाठीही तुमची तयारी असायला हवी.

पुढील कामांचा समावेश यात होतो :

कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कामावर देखरेख करणं.

दुकानात (डिपार्टमेंटल स्टोअर्स) आलेल्या ग्राहकांना चांगली सेवा देणे. तसेच, या ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ निवारण करणं.

व्यापारी संकल्पना, योजना आकर्षकरित्या मांडणं.

स्टोअर्सचा स्टॉक तपासणं, त्यावर लक्ष ठेवणं. तसंच, ऑर्डर्स आणि पुरवठा आदी गोष्टींकडे लक्ष पुरवणं

दुकानातील मालाच्या विक्रीचा आणि आर्थिक उलाढालीचा रेकॉर्ड ठेवणं.

सुरक्षा प्रक्रियांची अंमलबजावणी आणि देखरेख करणं.

आपल्या आउटलेटमधील विक्रीचं लक्ष्य (टार्गेट) साध्य होतंय की नाही ते पाहणं. हे लक्ष्य साध्य होत नसल्यास योग्य त्या उपाययोजना करणं.

या क्षेत्रातला प्रवेश :

या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे खूप उच्च शिक्षण असणं गरजेच आहे, असं अजिबात नाही. प्रोफेशनल स्तरावरील उच्च शिक्षण नसतानाही तुम्ही या क्षेत्राकडे वळू शकता. बारावी किंवा ग्रॅज्युएशननंतर डिप्लोमा/बॅचलर कोर्स करून तुम्ही रिटेल मॅनेजमेंट क्षेत्रात स्वत:चं करिअर घडवू शकता.

नोकरीच्या संधी :

कस्टमर सेल्स असोसिएट

डिपार्टमेंट मॅनेजर/पुलोअर मॅनेजर/

कॅटेगरी मॅनेजर

स्टोअर मॅनेजर

रिटेल ऑपरेशन मॅनेजर

रिटेल बायर्स अँड मर्कंडायझर्स

व्हिज्युअल मर्कंडायझर्स

मॅनेजर बॅक एंड ऑपरेशन्स

लॉजिस्टिक्स अँड वेअरहाउस मॅनेजर्स

रिटेल कम्युनिकेशन मॅनेजर

मॅनेजर प्रायव्हेट लेबल ब्रँड्स

रिटेल मार्केटिंग एक्झिक्युटिव्हज

या क्षेत्रात करिअरच्या प्रचंड संधी आहेत. डिपार्टमेंटल स्टोअर्स, डिझायनर्स बुटिक, पास्ट फूड चेन्स, म्युझिक स्टोअर्स, सुपर मार्केट्स, कंपनी स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स शो रुम्स, ऑटोमोबाइल डीलर्स यांसारख्या अनेक ठिकाणी रिटेल मॅनेजरची आवश्यकता असते. याशिवाय, मोठमोठ्या कंपन्यांच्या फ्रँचायझीमध्येही कामाच्या संधी मिळू शकतात.

हे कोर्स उपलब्ध असणाऱ्या काही संस्था :

एल.एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च www.welingkar.org

सिम्बॉयसिस सेंटर पॉर डिस्टन्स लर्निंग www.scdl.net

एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑप मॅनेजमेंट अँड रिसर्च f2www.bcids.org

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी www.iij.net.in

स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग! How to get success in Competative Exams - In marathi language

स्पर्धा परीक्षांच्या यशाचा मार्ग!


स्पर्धा परीक्षांमधून ‌करिअरच्या विविध वाटा फुटतात. पण याविषयी अनेक विद्यार्थ्यांना पुरेशी माहितीच नसते. त्यामुळेच महाराष्ट्र टाइम्स, मुंबई विद्यापीठ आणि संकल्प आयएएस फोरम यांनी एकत्रितपणे 'स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवा यश!' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. 

एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. या स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश ‌कसे मिळवावे, या परीक्षांची तयारी नेमकी कधी आणि कशी करावी? याबद्दल सखोल मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स, मुंबई विद्यापीठ आणि संकल्प आयएस फोरम यांनी एकत्रितपणे 'स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवा यश!' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. जय वाघमारे व अक्षय तापडिया या यूपीएससी परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थीसह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, संतोष रोकडे, संकल्प आयएएस फोरमच्या ज्योती रामदास, वसई -विरार महानगरपालिकाच्या उपायुक्त संगीता धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले आणि सखोल मार्गदर्शनही केलं. या सेमिनारला विद्यार्थी-पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

ध्येयवेडे व्हा 

स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायचं असेल, तर विद्यार्थ्याने ध्येयवेडं असणं, अतिशय गरजेचं आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा परीक्षेचं स्वरूप बदललं तर त्याची कारण समजून घेणं, महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणारे सर्वच विद्यार्थी हुशार असतात. पण या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर कल्पकता असणं गरजेचं आहे. हुशार असण्यापेक्षा स्मार्ट असाल तर या परीक्षांमध्ये तुम्ही सहज उजवे ठराल. अभ्यास पूर्ण असेल, तुमच्या उत्तरांवर ठाम राहू शकत असाल तरच परीक्षेला सामोरं जा. परीक्षेचा अभ्यास करत असताना कोणत्याही रेडीमेड अभ्यास साहित्यावर विसंबून राहू नका. डिग्री पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तेरावीपासूनच परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. डिग्री पूर्ण झाल्यावरसुद्धा खंबीर पाठिंबा म्हणून एखादी नोकरी शोधा. एमपीएससीचा अभ्यास करत असाल तर गणित आणि इंग्रजीच्या अभ्यासावर विशेष भर द्या. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत. केवळ आयएएस झालेल्या व्यक्तींनी लिहिलेलीच पुस्तक वाचा. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. तेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे सहज सोप्पे असतात. मात्र त्यांची नेमकी ठाम उत्तर विद्यार्थ्यांना देता आली पाहिजेत. तुमच्या विचारांत सुस्पष्टता असणं, यावेळी महत्त्वाच ठरतं. स्वतःचे नोट्स काढल्यास त्याचा फायदा यावेळी निश्चितपणे होतो. कोणत्याही योजनेची बांधणी करताना त्या योजनेचा कोणी गैर फायदा घेणार नाही. योजनेचा दुसरा पर्यायी अर्थ निघणार नाही. योजनेत कोठेही पळवाट निघणार नाही, या सर्व बाबींची काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी तुमचे विचार हे नियोजनबद्ध असणं, अतिशय महत्त्वाचं आहे. कोणाच्याही दबावाखाली काम न करता एखादी योजना ठामपणे यशस्वी पार पाडून दाखवेन हा ठामपणा तुमच्यात असावा. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून स्पर्धा परीक्षांकडे वळलात तरी हरकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व क्षेत्रांना समान संधी आहेत. चांगले अधिकारी असाल तर तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत. 

- संतोष रोकडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक 

अपयशाने शिकवलं 

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाही आयुष्यात पुढे काय करायचं, हे माझ पक्कं नव्हतं. तेव्हा दहा वर्षानंतर मला स्वतःला कोणत्या स्थानी पाहायचं आहे, याचा मी विचार करू लागलो. कॉलेजमध्ये अभ्यासासोबतच सामाजिक उपक्रमांतही प्रामुख्याने असायचो. या वेळीच मला युपीएससीच्या परीक्षांची ओळख झाली. मित्र म्हणाले की, इंजिनीअरिंग आणि युपीएससी दोन्ही एकत्र का देत नाही. तेव्हा मी अभ्यासक्रम पहिला आणि अभ्यासाला लागलो. पुरेशी तयारी नसतानाही परीक्षेला सामोरा गेलो होतो. कँपस इंटरव्ह्यूमध्ये चांगली नोकरी मिळाली असतानाही आपण या नोकरीला पुरेसा न्याय देऊ शकत नाही, ही भावना सतत मनात होती. तेव्हा ही नोकरी सोडून पूर्ण वेळ युपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. बेसिक गोष्टी समजून घेण्याकडे भर दिला. प्रिलियम्समध्ये मोजकेच गुण मिळाले. पण मेन्ससाठी पात्र झाल्याने आता कमी वेळात जितकं समजेल तितकं पटापट आत्मसात करून घेणं, गरजेच होतं. पण विषयाची आवड असेल, मनापासून अभ्यास केला तर विषय पटापट समजू लागतो, असं म्हणतात. माझ्या बाबतीतही तसंच होत होतं. पण दिवसभर अभ्यास करूनही तिथे माझी डाळ शिजली नाही. बराच मागचा नंबर मिळवत पास झालो. हे मोठं अपयश पचवत परत दोन दिवसांनी अभ्यासाला लागलो. मेहनतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, हे तेव्हा कळून चुकलं होतं. तेव्हा वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नात ३०३ वा आलो. पण त्या अपयशाने खूप काही शिकवलं. अपयशाने खचून न जाता अधिक मेहनतीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्यात जर आवड असेल, तळमळ असेल तर तुमच्या पासून ते यश कोणीही हिसकून घेऊ शकत नाही. युपीएससीसाठी मेहनत घेत असाल तर एकमेकांना मदत करा. अभ्यासाचे साहित्य एकमेकांशी शेअर करा. युपीएससीचा असा मिळून मिसळून अभ्यास केला तरच पुढे जाता येत. युपीएससी आणि तुमचे सहकारी यांच्याबाबत योग्य दृष्टीकोन ठेवा. इतर व्यक्ती काय सल्ला देत आहेत, या पेक्षा आपल्या अभ्यासाला प्राधान्य द्या. मुलाखतीला जाताना कोणत्याही विषयाचा कमी जास्त अभ्यास करायचा नसतो. परीक्षेमध्ये कोणताही अमुक असा ट्रेंड नसतो, हे लक्षात घ्या. सर्व विषयांचा समान अभ्यास करा. अमुक एक प्रश्न परीक्षेत का विचारला गेला आहे, हे नीट समजून घ्या आणि त्यानुसारच उत्तर द्या. मुलाखत सर्वस्वीपणे तुमच्यावरच अवलंबून असते. मुलाखतीच्या वेळी बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. पण सर्वांत आधी तुम्ही स्वतःला दहा वर्षानंतर कोणत्या स्थानी पाहायचं आहे, हे आजच ठरावा. 

-अक्षय तापडिया, युपीएससी २०१३ मध्ये ३०३ वा 

अवांतर वाचनाला पर्याय नाही 

स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनावर अधिक भर द्यायला हवी. यामध्ये पुस्तकांच्या वाचानापेक्षाही अवांतर वाचनावर अधिक लक्ष द्यायला हवं. त्यांच्याकडे फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्याच सोबत मेहनत घेण्याचीही तयारी असावी लागते. प्रत्येकालाच स्पर्धा परीक्षा द्यायची असते. पण त्यासाठी घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत मात्र अनेकांना नको असते. यशस्वी होण्यासाठी स्वप्न, संधी आणि साध्य हे तीन शब्द अतिशय महत्त्वाचे असतात. यशस्वी होण्यासाठी स्वप्न पाहणं, अतिशय गरजेचं असतं. स्वप्न पाहताना तुम्ही पाहत असलेलं स्वप्न हे नेहमी मोठं असावं. योग्य संधी लक्षात घेऊन हे स्वप्न साध्य करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी नेहमीच असावी. यासाठी स्वतःला झोकून देता आला पाहिजे. देश बदलायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला हवी. युवा वर्ग स्पर्धा परीक्षांकडे वळायला हवा. ध्येय वेड असणं म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. मग तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. 

- संगीता धायगुडे, उपायुक्त, 

वसई -विरार महानगरपालिका 

अभ्यासाचं नियोजन करा. 

सरकारी नोकरी, चांगलं पद, भरगच्च पगार आणि फिरायला सरकारी गाडी; इतकाच स्पर्धा परीक्षांचा अर्थ मला ठाऊक होता. आयआयटीमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं. माझं सुद्धा हे स्वप्न होतं. मात्र आयआयटीमधून इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर मला त्यात फार रस नाही, दिसून आलं. तेव्हा आयआयएममधून मी माझं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. आणि आयबीएमसारख्या मोठ्या कंपनीत बड्या पगाराची नोकरीही मिळाली. तिथे मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करताना अनेक सरकारी अधिकाऱ्यांना भेटता आलं. त्यांच्या बोलण्यातून मला स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळाली. ते करत असलेलं काम फार आवडलं. मग आणखी काही अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. कंपनीला फायदा मिळवून देण्यापेक्षा देशाला फायदा मिळवून देण्याचं हे उत्तम साधन असल्याचं तेव्हा मला कळालं. माझे काही मित्रसुद्धा युपीएससीची तयारी करत होते. त्यांनाही मी जाऊन भेटलो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्हाला इथे समाजात काम करण्याची संधी तुम्हाला इथे मिळते, हे समजलं. सर्वांची मतं जाणून घेत अखेर दोन ते तीन महिन्यांनी ठाम निर्णय घेत मी नोकरी सोडली. तेव्हा प्रिलियमला केवळ पाच महिने उरलेले असताना मी अभ्यासाला सुरुवात केली. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, इतकंच माझ्या मनात होतं. त्यानुसार प्रामाणिकपणे अभ्यास केला. स्वतःशी प्रामाणिक राहिलो. वाचनावर भर दिला. वाचलेलं समजून घेऊन त्याच्यावर खोलात जाऊन अभ्यास केला. त्या अभ्यासाचा संबंध समाजातील इतर गोष्टींशी लावण्याचा प्रयत्न केला. त्याचाच निश्चितपणे फायदा झाला. पहिल्याच प्रयत्नात नंबरात आलो. नीट वेळापत्रक बनवून अभ्यासाचं नेमकं नियोजन करा. सातत्याने अभ्यास केला तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. 

-जय वाघमारे, युपीएससी २०१३ मध्ये ९७३ वा 

नियोजन महत्त्वाचं... 

तुमचा स्वाभाविक कल आणि दृष्टीकोन सगळ्यात महत्त्वाचा आहे. दृष्टीकोन योग्य असेल तर स्वाभाविक कल बनवणं सहज शक्य होईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपला अभ्यास हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता त्यावर पुरेसं संशोधन होणं, गरजेचं आहे. आपला देश हाच आपला अभ्यास असल्याने त्याचं विद्यार्थ्यांना दडपण येण्याचं अजिबात कारण नाही. योग्य दिशेने योग्य प्रयत्न करत योग्य नियोजनाच्या सहाय्याने योग्य तयारी केली तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणं, फार अवघड नाही. जिद्द आणि समर्पित वृत्ती विद्यार्थ्यामध्ये असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी निश्चितपणे उतरावं. 

- ज्योती रामदास, संकल्प आय ए एस फोरमच्या ज्येष्ठ अध्यापक 

मराठीचा न्यूनगंड कशाला? 

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसतायत. मातृभाषेवर जर प्रभुत्व असेल तर कोणतीही भाषा शिकणं तुम्हाला फार अवघड वाटणार नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालं असेल तरी इंग्रजी आणि गणित या दोन विषयांकडे अधिक लक्ष देणं गरजेचं ठरेल. पण केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याचं डोक्यात ठेऊन न्यूनगंड बाळगण्याच कारण नाही. 

आरक्षणाचा विचार नको 

स्पर्धा परीक्षानंतर भरतीमध्येही संविधानिक आरक्षणाचे सर्व नियम लागू होतात. पण माणूस म्हणून आणि एक अधिकारी म्हणून सक्षम असाल तर आरक्षणाचा विचार करण्याची गरज नाही. भरतीच्या वेळी अनेक जागा अनेक पद उपलब्ध आहेत. आरक्षण आणि गुणवत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अखेर गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. तेव्हा आरक्षणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या. 

अभ्यासेतर उपक्रमही महत्त्वाचे... 

कॉलेजमध्ये तुम्ही सहभागी असलेल्या अभ्यासेतर उपक्रमांनासुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्व दिलेलं आहे. स्पर्धा परीक्षांचा अर्ज भरताना तुम्हाला याबाबत लिहायचं असतं. एनएसएस, एनसीसी, स्टूडन्ट कौन्सिल, आदी उपक्रमांतील तुमचा सहभाग तुम्ही इथे नोंदवू शकता. मुलाखतीच्या वेळी तुम्हाला या उपक्रमांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नांची नेमकी उत्तरं देणं गरजेचं असतं. नेतृत्त्व गुण, सामाजिक बांधिलकी, निर्णयक्षमता आदी गुण या प्रश्नांमधून तपासले जातात.

Get job in nationalised bank

बँकेत भरती व्हा!

bank
२७ राष्ट्रीयकृत बँकापैकी २१ बँकांमधील (स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून) प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकच सामायिक लेखी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी २१ राष्ट्रीयकृत बँकाबरोबरीनेच अन्य बँका आणि वित्त संस्थासाठीसुद्धा ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. परीक्षा घेण्याचं काम इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था करत आहे. सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या (www.ibps.in) वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतील. 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत - २२ जुलै ते ११ ऑगस्ट २०१४ 

लेखी परीक्षा (ऑनलाईन) दिनांक - ११,१२,१८,१९ ऑक्टोबर २०१४ व १,२ नोव्हेंबर २०१४ 

वयोमर्यादा - किमान २० वर्षं, कमाल ३० वर्षं 

(अनुसूचित जाती/जमातींसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षं तर ओबीसींसाठी ३३ वर्षं इतकी आहे.) 

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक. 

लेखी परीक्षेचं स्वरूप : लेखी परीक्षा ऑनलाईन (कॉम्प्युटराईज्ड) घेतली जाईल. प्रश्नपत्रिका २०० गुणांची असून, प्रश्नांचं स्वरुप वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) असेल. रिझनिंग (५०), इंग्रजी (४०), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड (५०), सामान्य ज्ञान (विशेषतः बँकिंग संदर्भात)(४०), संगणक ज्ञान(२०) अशी विषयवार गुणांची विभागणी आहे. परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ इतके गुण कमी केले जातील. 

लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीसाठी १०० गुण असून त्यामध्ये किमान ४० गुण (राखीव वर्गासाठी ३५ गुण) मिळवणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के वेटेज असेल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार आय.बी.पी.एस. उमेदवारांची निवड करेल.

Monday, July 7, 2014

डॉ. दाभोलकरांचा मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी केलं प्लॅन्चेट Planchet to find Dr. Dabholkar Murderer

ज्या अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं त्याच अंधश्रद्धेचा वापर करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं बिनडोक काम पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते आशिष खेतान यांनी केला आहे.


आऊटलुक या मासिकामध्ये छापून आलेल्या लेखामध्ये आशिष खेतान यांनी गुलाबराव पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रतापाचा लेखाजोखा मांडला आहे. 

दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नाही, असं दिसल्यानंतर पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चक्क प्लॅन्चेटचा विधी केला. माजी पोलिस अधिकारी रणजित अभ्यंकर यांच्या साथीनं प्लॅन्चेटची विधी केल्याचा दावा खेतान यांनी केला आहे. ही माहिती खुद्द पोळ यांनीच आपल्याला दिल्याचंही खेतान यांनी सांगितलं आहे.

या तंत्र-मंत्राच्या विधीसाठी पोळ यांना साथ मिळाली ती निवृत्त पोलिस हवालदार मनिष ठाकूर यांनी. विशेष म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पोलिस आयुक्तालयात झाल्याचा दावाही खेतान यांनी केला आहे.

जेव्हा हा विधी सुरु झाला त्यावेळी मनिष ठाकूर यांच्या अंगात डॉ. दाभोलकरांचा आत्मा आला आणि त्यांनी आपल्यावर हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीचा घटनाक्रमही सांगितला. अशी माहिती पोलिस आयुक्त पोळां यांनी खेतान यांना सांगितल्याचं आऊटलूक मासिकातील लेखात दिली आहे.

दरम्यान हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा गुलाबराव पोळ यांनी केला असून खेतान यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं पोळ यांनी सांगितलं आहे.

Friday, July 4, 2014

एक सुट्टी पाऊण तासाची

एक सुट्टी पाऊण तासाची


दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे, स्वतःच्या आवडत्या छंदासाठी, फिटनेससाठी किमान अर्धा तास तरी काढला पाहिजे... वगैरे वगैरे असं स्त्रियांना सतत सांगितलं जातं. मुद्दा अगदी खरा असला, तर प्रश्न येतो, तो खरंच असा वेळ काढता येतो का याचा. कित्येकींना इच्छा असूनही स्वतःसाठी वेळ काढता येत नाही किंवा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे हेही लक्षात राहात नाही. मग एक दिवस सगळं नकोनकोसं वाटतं. खरंच थोडासा वेळ काढून स्वतःचे लाड करावेसे वाटतात. चक्क सुट्टी घेऊन कुठेतरी निघून जावंसं वाटतं. वेगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर मिळणारी ऊर्जा हवीहवीशी वाटते; पण जाणार कसं? म्हणून आम्ही तुम्हाला फक्त ४५ मिनिटांत सुट्टीवर जाऊन आल्यासारखा ताजेपणा कसा अनुभवायचा ते सांगणार आहोत.

साहित्य - या ४५ मिनिटांसोबतच थोडंसं साहित्यही आपल्याला लागणार आहे. ते असं... खूप दिवस वाचायचं राहून गेलेलं किंवा खूप आवडीचं एखादं पुस्तक, आवडत्या रंगाचं नेलपॉलिश, एक छोटा टब भरून कोमट पाणी, पेपरमिंट सॉल्ट (नसल्यास साधं मीठ), मऊ, गुबगुबीत टॉवेल, आवडतं ड्रिंक, आवडतं संगीत आणि आवडीचं खाणं.

काय करायचं?... सगळ्यात आधी मोबाइल, लँडलाइन, घराची बेल, टीव्ही, लॅपटॉप बंद करा.

घरातली तुमची आवडती जागा किंवा निसर्गरम्य दृष्य दाखवणारा एखादा कोपरा, खिडकी पकडा. तिथून दिसणारं दृश्य जितकं चांगलं तितकं छान. तिथं बसा आणि वाऱ्याची झुळूक अंगावर घेत आवडत्या ड्रिंकचा एक घोट घ्या. मग, तुमचे तळपाय टबमधल्या कोमट पाण्यात बुडवा. त्यात पेपरमिंट सॉल्ट टाका. आता मस्तपैकी मागे टेकून बसा आणि पुस्तक उघडा. ही झाली तुमचं मन रिलॅक्स करण्यासाठीची पहिली पायरी.

२० मिनिटांनंतर टबमधून पाय बाहेर काढा आणि टॉवेलनं पुसून घ्या. नखांना आवडीचं नेलपॉलिश लावा... ड्रिंकचा आस्वाद घेणं थांबवू नका. अधेमधे एखादा घोट घेत राहा. हळूहळू तुमचं मन शांत झालंय असं तुम्हाला जाणवेल. सगळ्या काळज्या, ताण यापासून मन दूर गेलंय आणि हलकं झालंय असं तुम्हाला वाटायला लागेल. मग, तुमच्या आवडत्या जेवणावर ताव मारा. या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर येणारं फिलींग सुखदच असणार हे नक्की!

Gateway to Engineering admission

गेटवे टू इंजिनीअरिंग


बहुप्रतीक्षित इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अखेर २३ जूनपासून सुरू होत आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) शुक्रवारी कागदपत्र पडताळणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि तो कन्फर्म करणे या प्रवेशाच्या प्राथमिक टप्प्याची माहिती अधिसूचनेद्वारे जारी केली आहे.

प्रवेशाचा पहिला टप्पा 

* स्वायत्त इंजिनीअरिंग कॉलेजेस, राज्य सरकारी किंवा अनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजेस, युनिव्हर्सिटी मॅनेज्ड इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, आयसीटी, मुंबई आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (कॅप) सहमतीने सहभागी होत असलेली खासगी इंजिनीअरिंग कॉलेजेस आदी संस्थांमधील प्रवेशांसाठी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पार पाडण्यात येणार आहे. 

* प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, तो अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) जाऊन कन्फर्म करणे आणि कागदपत्र पडताळणी करणे या प्रक्रियांचा समावेश आहे. 

प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 

* विद्यार्थी भारतीय नागरिक असावा आणि त्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (एचएससी बोर्ड) किंवा समकक्ष बारावीची परीक्षा दिलेली असावी. 

* फिजिक्स, गणित आणि केमिस्ट्री/बायोटेक्नॉलॉजी/बायोलॉजी/टेक्निकल व्होकेशनल (टेक्निकल व्होकेशनल विषयांची यादी 'डीटीई'च्या वेबसाइटवर आहे. त्यात आयटी विषयाचा (कोड ९७) समावेश आहे.) विषयांत ५० टक्के किंवा त्याहून अधिक (राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ४५ टक्के किंवा त्याहून अधिक) गुण मिळवलेले असावेत. 

* महाराष्ट्रातील (८५ टक्के जागा) विद्यार्थ्यांचा 'पॉझिटिव्ह कम्पोझिट स्कोअर' असावा. (या स्कोअरबाबतचा तपशील नंतर स्वतंत्रपणे जाहीर होणार आहे.) 

अर्जप्रक्रियेचे स्वरूप 

* विद्यार्थ्यांनी जवळच्या अर्ज स्वीकृती केंद्रावरून (एआरसी) रोख ७०० रुपयांना (राखवी गटातील विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये) अॅप्लिकेशन किट खरेदी करावे. 

* विद्यार्थ्यांनी 'अॅप्लिकेशन किट'च्या मदतीने www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन (प्रतिनिधी चालणार नाही) निश्चित करायचा आहे. या वेळी आवश्यक कागदपत्रेही (मूळ आणि साक्षांकित) सादर करायची आहेत. 

* पोस्टाने पाठवलेले अर्ज रद्दबातल ठरविण्यात येतील. 

महत्त्वाच्या सूचना 

* अॅप्लिकेशन किटमध्ये अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड असेल. त्याचबरोबर प्रवेश फेऱ्यांच्या (कॅप) पायऱ्या आणि त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे यांचीही त्यात माहिती असेल. अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्डच्या आधारे ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. 

* ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि नंतर तो 'एआरसी'वर स्वतः जाऊन कन्फर्म करणे आवश्यक आहे. 

* महाराष्ट्रातील जे विद्यार्थी महाराष्ट्रासाठीच्या जागांबरोबरच अखिल भारतीय कोट्यातील प्रवेशासाठी इच्छुक असतील, त्यांनी एकच ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. अशा विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार दोन्हीपैकी उपलब्ध सर्वोत्तम जागा दिली जाईल. 

* भारताबाहेर बारावी किंवा समकक्ष परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पात्रतेबाबत आधी राज्यातील विद्यापीठांकडून पडताळणी करून घ्यावी. 

* ऑनलाइन अर्ज भरून, तो 'एआरसी'वर कागदपत्र पडताळणीसह कन्फर्म करून घेतलेले आणि त्यानंतर गुणवत्ता क्रमांक (मेरिट नंबर) मिळालेले विद्यार्थीच 'कॅप'साठी पात्र ठरतील, याची नोंद घ्यावी. 

* सर्व 'एआरसी' रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहतील. 

* विद्यार्थ्यांना २८ जून ते ३ जुलै या काळात 'एआरसी'वर माहिती पुस्तिका विनामूल्य मिळेल. 

* 'एआरसी'ची यादी www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवर आहे. 

* हेल्पलाइन क्रमांक : ०२२-३०२३३४४४/४५/४६ 

वेळापत्रक 

* 'एआरसी'वर 'अॅप्लिकेशन किट'ची विक्री : २३ जून ते २ जुलै 

* www.dtemaharashtra.gov.in/fe2014 या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज भरणे : २३ जून ते ३ जुलै 

* 'एआरसी'वर विद्यार्थ्याने समक्ष जाऊन कागदपत्र पडताळणी आणि ऑनलाइन अर्ज कन्फर्म करणे : २३ जून ते ३ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 

* तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जुलै सायंकाळी ५ वाजता 

* तात्पुरत्या यादीवर आक्षेप : ६ ते ८ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) 

* अंतिम गुणवत्ता यादी : ९ जुलै सायंकाळी ५ वाजता 

'जेईई-मेन'बाबत सूचना 

'जेईई-मेन' दिलेल्या विद्यार्थ्यांचे बारावीचे गुण त्या-त्या बोर्डाने 'सीबीएसई'कडे दिले आहेत. हे गुण www.jeemain.nic.in या वेबसाइटवर उपलोड करण्यात आले आहेत. 'जेईई-मेन' दिलेल्या विद्यार्थ्यांनी 'Confirmation of class 12th/Qualifying Examination Marks as received from Board' या लिंकवर जाऊन आपले गुण बरोबर आहेत ना, याची पडताळणी करावी. त्यात काही चूक असल्यास २७ जूनपर्यंत त्याबाबतची पूरक कागदपत्रे (गुणपत्रिका) अपलोड करावी. शंका असल्यास jeeboardmarks@gmail.com यावर ई-मेल करावी, असे आवाहन 'जेईई-मेन'च्या परीक्षा संचालकांनी केले आहे.

Opportunity in Physiotherapy

फिजिओथेरपीमध्ये भरघोस संधी

बायोलॉजीची एक शाखा म्हणजे फिजिओथेरपी. रोजच्या आयुष्यात आपल्या शरीराची हालचाल नीट होणं आवश्यक असतं. प्रत्येक अवयवाचं कार्य पूर्ण क्षमतेने व्हावं लागतं. पण काही वेळेस अपघात किंवा अशाच काही प्रसंगांमुळे अवयव, सांधे आखडतात किंवा दुखावतात. अशा वेळी त्या अवयवांना किंवा सांध्यांना पुन्हा सुधारण्याचं काम फिजिओथेरपिस्ट करतात. नर्सेस आणि अॅक्युपेशनल थेरपिस्ट यांसारख्या हेल्थ प्रोफेशनल्सबरोबरही फिजिओथेरपिस्ट काम करतात.

स्पेशलायझेशन :

1. कार्डिओपलमोनरी फिजिओथेरपिस्ट:
अस्थमा, छातीमधील संसर्ग तसेच, मोठ्या सर्जरीनंतर पेशंटना स्वत:ची तब्येत सुधारण्यासाठी सहाय्य करण्याचे काम हे तज्ज्ञ करतात. हृदयासंबंधित आजार आणि श्वसनाच्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपिस्ट मदत करतात.

२. गेरिअॅट्रिक फिजिओथेरपिस्ट :
वय वाढल्यामुळे वृद्धांमध्ये येणाऱ्या समस्या सोडवणं आणि त्यांच्या शरीराचं कार्य अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी हे तज्ज्ञ मदत करतात.

३. मस्क्यूलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट :
हे तज्ज्ञ स्नायूंच्या बिघडलेल्या हालचालींचं निरीक्षण करून, पेशंटची मेडिकल हिस्ट्री अभ्यासून त्याला बरं करतात.

४. न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट :
मेंदूशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट मदत करतात.

५. पीडियॅट्रिक फिजिओथेरपिस्ट :
हे तज्ज्ञ लहान मुलांमधील समस्या सोडवतात.

६. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट :
खेळाडूंना येणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट करतात.

फिजिओथेरपी या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर बारावी सायन्सनंतर डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री करता येईल. बॅचलर डिग्री कोर्सला प्रवेश घेण्यासाठी संबंधित प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

फिजिओथेरपिस्ट कोर्स उपलब्ध असणाऱ्या संस्था :

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, अॅक्युपेशनल थेरपी

वेबसाइट : www.dypatil.com

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन

वेबसाइट : www.aiipmr.gov.in

स्कूल ऑफ फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक सेंटर, केईएम हॉस्पिटल,

वेबसाइट : www.kem.edu

स्कूल ऑफ फिजिओथेरपी, बीवायएल नायर हॉस्पिटल

वेबसाइट : www.nair.edu

Opportunity in Bank Jobs

बँकेत नोकरीची संधी!


प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर्स आणि असिस्टंटची भरती होणार आहे. त्याद्वारे नोकरीच्या अनेक चांगल्या संधी आहेत. 

देशभरातील ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकातील ऑफिसर्स आणि असिस्टंटच्या पदांच्या भरतीसाठी दरवर्षी आय.बी.पी.एस. (इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) परीक्षा घेते. ज्या राज्यांमध्ये संबंधित बँक आहे त्या राज्याची राजभाषा उमेदवाराला येणं आवश्यक आहे. संबंधित भाषा उमेदवाराने १० वी/ १२ वी किंवा पदवीस्तरावर शिकलेली असणं आवश्यक आहे. तसेच सर्व पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता 

ऑफिसर्स श्रेणी - ३ 

किमान २१ वर्षे कमाल ४० वर्षे, पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक, क़ृषि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम, लॉ, मॅनेजमेंट, अकाऊंटस, अर्थशास्त्र, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, आय.टी., बँकीग, फायनान्स, मार्केटिंग या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. ऑफिसर म्हणून बँकेत किंवा वित्त संस्थेत ५ वर्षे कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. 

ऑफिसर्स श्रेणी - २ 

किमान २१ वर्षे , कमाल - ३२ वर्षे, पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक. कृषि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम, लॉ, मॅनेजमेंट, अकाऊंटस, अर्थशास्त्र, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, आय.टी., बँकीग, फायनान्स, मार्केटिंग या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. 

या श्रेणीमध्ये आय.टी.ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, लॉ ऑफिसर, ट्रेझरी मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, कृषि अधिकारी या स्पेशालिस्ट ऑफिसर्सचीसुद्धा निवड केली जाईल. संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रमामध्ये उमेदवाराने उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील कामाचा १ / २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

ऑफिसर्स श्रेणी - १ 

किमान - १८ वर्षे, कमाल - २८ वर्षे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी क़ृषि विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम, लॉ, मॅनेजमेंट, अकाऊंटस, अर्थशास्त्र, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, आय.टी. या विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. 

असिस्टंट 

किमान - १८ वर्षे, कमाल - २८ वर्षे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी 

निवडप्रक्रिया - सर्व पदांसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाते. परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून संगणकावर ऑनलाईन पध्दतीने घेतली जाते. पदांनुसार लेखी परीक्षेतील विषयांमध्ये बदल केले जातात. लेखी परीक्षा ही २०० गुणांसाठी घेतली जाते. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात. 

प्रवेश अर्ज - प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत ९ जुलै २०१४ आहे. लेखी परीक्षा ऑगस्ट शेवटच्या आठवडयापासून ते सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत घेतल्या जातील. प्रवेश अर्ज भरण्यासाठी तसेच सविस्तर माहितीसाठी www.ibps.in ही वेबसाईट पहावी.

Less Marks, more opportunity after SSC

कमी मार्क जास्त संधी


कमी मार्क मिळाले म्हणजे करिअरचे सगळे राजमार्ग आपल्यासाठी बंद झाले, असा अनेकांचा समज होतो. पण तसं अजिबात नाही. करिअरच्या अनेक वाटा आहेत, फक्त त्या आत्मविश्वासाने शोधायला हव्यात. 

एफवायच्या प्रवेशाची प्रक्रिया संपून आता कॉलेजेस सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. पण ४५ ते ७० टक्क्यांदरम्यान गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांसमोरील करिअर निवडीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांच्या जवळपास आहे. या विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा सापडावी यासाठी मटातर्फे 'कमी मार्कांत उज्वल भविष्य' हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबवला जात आहे. ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिरमध्ये झालेल्या अशाच एक सेमिनारमध्ये करिअर कौन्सिलर सुचित्रा सुर्वे (डायरेक्टर, ग्रोथ सेंटर) आणि लक्ष्मीबाई ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल पूजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन केलं.

इंग्रजीची भीती सोडा, 

प्रा. पूजा कुलकर्णी 


सर्वप्रथम यांनी कमी गुण मिळण्याची कारणे याबद्दल सांगितले. यातील महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी भाषेबद्दलचा न्यूनगंड. बरेचदा दहावीमध्ये चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळतात. यामध्ये मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दहावीपर्यंतचा अभ्यास मातृभाषेत असल्याने तो सोपा वाटतो. पण इंग्रजीच्या बेसिक गोष्टींकडे लक्ष न दिल्याने इंग्रजीची भीती वाटू लागते. ही भाषा आपल्याला येणारच नाही या भीतीने एक प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण होतो. याचबरोबर आजच्या सोशल मिडियामुळे इंग्रजीचा ऱ्हास होत आहे. मेसेजिंग लँग्वेजमुळे अनेक भाषांची सरमिसळ करून वाक्य लिहिली जात आहेत. पण त्यामुळे इंग्रजी वाक्यरचनेचा बेसच मुलांच्या लक्षात येत नाही. इंग्रजी वाचत नाहीत, लिहित नाहीत आणि मुख्य म्हणजे ऐकत नाहीत. त्यामुळेच त्यांची इंग्रजी भाषेची भीती अधिकाधिक गडद होत जाते. पण खरंतर या भीतीचं अवडंबर करण्याची मुळीच गरज नाही. इंग्रजीचा न्यूनगंड बाळगल्याने कितीतरी हुशार विद्यार्थी कोशात जातात. आपल्याला हे जमणारच नाही, एखादा विषय कळणारच नाही ही संकुचित वृत्ती निर्माण होते. त्यामुळे भीती न बाळगता यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. याची पहिली पायरी म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. सकारात्मक दृष्टीकोन बाळगणे १००% तुमच्याच हाती असते. कोणत्याही गोष्टीची घोकंपट्टी करण्यापेक्षा त्याचे अवलोकन करा. भरपूर वाचा. त्याचा अर्थ समजून घ्या. आपली पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा. याचबरोबर विषयाशी निगडीत इतरही वाचन करा, त्यामुळे मूळ विषय सोपा वाटतो. इंग्रजी शिक्षणावर खूप भर देण्याचे कारण म्हणजे इंग्रजी तुमच्या करिअर आकार देणारा मुलभूत पाया आहे. इंग्रजी भाषा पक्की झाली कि त्या भाषेतील इतर विषय आपोआप समजतात. 

सकारात्मक विचार करा 

सुचित्रा सुर्वे 


अनेक विद्यार्थ्यांमध्ये असा गैरसमज आहे थोडे कमी मार्क मिळाले म्हणजे आपल्यासमोरील चांगल्या करिअरचे पर्याय संपले आहेत. पण कमी मार्क मिळाल्यानंतरही उत्तम करिअर घडवण्याचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. कमी मार्क आहेत म्हणून आपण झिरो आहोत हा विचार करणे सोडून द्या. ८०% पेक्षा जास्त मार्क मिळाले की फक्त मेडिकल आणि इंजीनिअरिंगचा विचार अजूनही केला जातो. त्यातही मेडिकल म्हटले की एमबीबीएस आणि इंजीनिअरिंग म्हटले की इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा काही मळलेल्या वाटांचाच विचार केला जातो. मात्र या क्षेत्रांमध्ये अजूनही अनेक प्रकारचे विषय असतात. त्यामुळे कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना कुछ हटके विचार करण्याची आणि चांगले करिअर निवडण्याची संधी निर्माण झालेल्या आहेत. कमी मार्क मिळाले म्हणून खचून न जाता सरळ बीए, बीकॉम बीएस्सी यांसारख्या प्लेन ग्रॅज्यूएशन कोर्सेसमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करा. त्यामुळे तुमचं बेसिक पक्कं होईल. हे कोर्सेस करताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयात शॉर्ट टर्म कोर्सेस, अॅडऑन कोर्सेस, हॉबी कोर्सेस करता येतील. आजकाल तरुणाईचा ओढा बीएएफ, बीएमएम, बँकिंग इन्श्युरन्स यांसारख्या सेल्फ फायनान्स कोर्सेसकडे आहे. प्लेन ग्रॅज्यूएशन कोर्सेसमधून तुम्हाला त्याच दर्जाचं शिक्षण मिळतं. त्यामुळे प्लेन पदवीनंतर तुम्हालाह या क्षेत्रांमध्ये संधी मिळतात. याचबरोबर बीएस्सी करून तुम्ही मेडिकलच्या पॅरामेडीकल, आयुर्वेद, इंजिनीअरिंगच्या सिरॅमिक, अॅग्रीकल्चरल यांसारख्या वेगळ्या वाटांचा विचार करावा. त्याचबरोबर नर्सिंग आणि टीचिंग क्षेत्रात अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर आर्ट‍्समधूनही अनेक संधीची दारे उघडली गेली आहेत. हिस्टरी, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, इकोनॉमिक्स आणि महत्वाचं म्हणजे रिसर्च क्षेत्रात आर्ट‍्सचे विद्यार्थी करिअर करू शकतात. 

इतरही काही पर्याय... 

बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर... बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात रिसर्च करणाऱ्यांसाठी खूप संधी आहेत. प्लेन सायन्सनंतर बायोलॉजी आणि बायोटेकनॉलॉजी करता येईल. 

एनडीए... एनडीएची प्रवेश प्रक्रिया ही खूपच कठीण असते. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. लेखी परीक्षेनंतर फिजिकल टेस्टसुद्धा पास होणे गरजेचे असते. एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर सैनिक म्हणून नाही तर कमांडर पदासाठी नियुक्ती होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना डिफेन्सच्या आर्मी, नेव्ही, आणि एअरफोर्स यापैकी कोणत्याही भागात ७ वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळते. ७ वर्षानंतर विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार पुढे सर्व्हिस वाढवता येते अथवा तो निवृत्ती घेऊन सिव्हिल आयुष्य जगू शकतो. डिफेन्समधून निवृत्ती घेतल्यानंतर कोणत्याही कंपनीत जॉब मिळतो. 

अॅग्रीकल्चर... अॅग्रीकल्चर म्हणजे केवळ शेती करणं नसून यामध्ये पिके, मासे यांसारख्या विषयात रिसर्चसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. माणसाला जगण्यासाठी अन्नाचीच गरज असल्याने अन्न निर्मिती आणि फूडरिसर्च या क्षेत्रामध्ये नेहमीच खूप संधी उपलब्ध असतात.

BMM in Marathi

मराठी बीएमएमला आले चांगले दिवस


मराठी बीएमएमला घरघर लागल्याची परिस्थिती गेली काही वर्षे सर्वच कॉलेजांमध्ये दिसून येत होती. पण यंदाची प्रवेश प्रक्रिया पहिली, तर मराठी माध्यमातील बीएमएम अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसते. अनेक कॉलेजांमध्ये उपलब्ध जागा भरून अनेक विद्यार्थी 'वेटिंग लिस्ट'वर असल्याचे दिसत आहे. निकालाची वाढलेली टक्केवारी, मराठी बीएमएम केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चांगल्या प्लेसमेंट्स यामुळे अनेक विद्यार्थी मराठी बीएमएमकडे वळत असल्याचे समजते.

पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मराठी बीएमएमला गेल्या वर्षीपर्यंत फारसा प्रतिसाद नव्हता. सोयी-सुविधा न मिळणे, प्राध्यापक नसणे अशा अनंत अडचणींना विद्यार्थ्यांना सोमोरे जावे लागत होते.
६० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या बॅचमध्ये जेमतेम ३० ते ४० विद्यार्थी प्रवेश घेत होते. मराठी बीएमएमला प्रतिसाद नसल्याचे सांगत मुंबईतील दोन प्रतिष्ठित कॉलेजांनी हा कोर्स बंदही केला होता. पण ही परिस्थिती आता सुधारताना दिसत आहे. अनेक कॉलेजांमध्ये यंदा उपलब्ध जागा भरून अनेक विद्यार्थी 'वेटिंग लिस्ट'वर असल्याचे दिसत आहेत. निकालाची वाढलेली टक्केवारी, इंग्रजी बीएमएमची वाढलेली कट ऑफ, मराठी बीएमएम केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चांगल्या प्लेसमेंट या कारणांमुळे अनेक विद्यार्थी मराठी बीएमएमकडे वळत असल्याचे सांगितले जाते. मराठी बीएमएमकडे वाढलेला कल पाहता साठ्ये कॉलेज आणि रुइया कॉलेजने १० टक्के वाढीव जागांसाठी मागणी केली आहे. 

A key for admission in Engineering

इंजिनीअरिंग प्रवेशाची गुरुकिल्ली


अॅप्लिकेशन फॉर्म भरताना अडचणी आल्यास काय करावे? कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर कसा मोजावा? ऑप्शन फॉर्म भरताना कॉलेज कसं निवडावं? प्राधान्यक्रम काय असावा? असे अनेक प्रश्न इंजिनीअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्यांचंच समाधान करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'इंजिनीअरिंग प्रवेशाची गुरुकिल्ली' या सेमिनारचं आयोजन केलं होतं. 

इंजिनीअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील प्रसिद्ध कौन्सिलर प्रा. केदार टाकळकर यांनी इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजून सांगत त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. तर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आत्मविश्वास वाढवणं कसं शक्य आहे, याचं मार्गदर्शन वालिया कॉलेजचे प्राचार्य, प्रा. विनायक परळीकर यांनी केलं. या कार्यक्रमाला कॉस्मोपॉलिटन्स एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट हर्सदजी वालिया, जॉइंट सेक्रेटरी दर्शना कोठारी, मेंबर ऑफ गव्हर्निंग कौन्सिल अजित बालन आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे जाणं महत्त्वाचं... 

दहावी आणि बारावी हे अभ्यासाचे दोन टप्पे पार पाडून विद्यार्थी जेव्हा इंजिनीअरिंगकडे वळतो, तेव्हा त्याला ही प्रवेश प्रक्रिया किचकट जाणवते. नेमक काय करणं अपेक्षित आहे, याचा गोंधळ मनात असतो. इंजिनीअरिंगचं शिक्षण म्हणजे काही तरी फार वेगळी गोष्ट आहे, अशी त्यांची सामान्य समजूत तयार होते. कॉलेज, कॉलेजची वेळ, तेथील वातावरण, अभ्यासक्रम हा इतरांपेक्षा फार वेगळा आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांची मनस्थिती स्थिर असावी. स्पर्धा सर्वच क्षेत्रांत आहे. प्रत्येक वेळी आपण ठरवतो, तसंच होईल असं नाही. मात्र विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींमधून पुढे जाण्याचा मार्ग शोधून काढणं गरजेचं आहे. आई किंवा वडील सांगतात म्हणून नव्हे, तर स्वतःसाठी शिकायचं, हे सदैव मनात असू द्या. आपल्या मध्ये अमर्याद कार्यक्षमता आहे. ती योग्य प्रकारे वापरात आणता आली पाहिजे. तेव्हा विचार करण्याच्या कक्षा वाढवा. आत्मविश्वास स्वत:हून निर्माण होईल. प्रत्येक वाक्याला जर तुम्ही पाच वेळा का? असा प्रश्न विचारला, तर त्याचे योग्य उत्तर मिळते. पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. एखादी गोष्ट तुमच्या कानावर आली, तर त्या गोष्टीची सत्यता पडताळून पहा. ती गोष्ट चांगली आहे की वाईट हे तपासा. त्याचा तुम्हाला उपयोग आहे का, हे पहा. या तीन गोष्टींची सकारात्मक उत्तरं मिळाली, तरच त्यावर चर्चा करा. आत्मविश्वास वाढवा म्हणून काही वेगळे करण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी आपल्याकडे उपजत आहेत. केवळ आपला दृष्टीकोन बदलला तर प्रत्येक अडचणींवर सहज मात करता येईल. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल, तर यशस्वी होणं सहज शक्य आहे. 

कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर इंजिनीअरिंगला प्रवेश हवा असेल तर कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर मोजताना विद्यार्थ्याला बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या विषयांत मिळालेल्या गुणांना आणि जेईई-मेन मध्ये मिळालेल्या गुणांना समान म्हणजेच पन्नास-पन्नास टक्के महत्त्व दिलं गेलं आहे. दोन्ही परीक्षांतील प्राप्त गुणांनुसार आठ डेसिमल पर्यंत मिळालेला कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लक्षात घेतला जातो. कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोअर विचारात घेऊनच मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. 

स्टेट मेरिट लिस्ट अप्लिकेशन फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर विद्यार्थ्यांच्या कम्पोझिट पर्सेन्टाइल स्कोरनुसार स्टेट मेरिट लिस्ट लावण्यात येते. या मेरिट लिस्ट मधील तुमच्या एसएमएल क्रमांकानुसार तुम्हाला कॅप राऊंडमध्ये कॉलेज उपलब्ध होतं. स्टेट मेरिट लिस्ट जाहीर होताच विद्यार्थ्यांना एसएमएल क्रमांकासह त्यांचे लिंग, जात, विद्यापीठ या गोष्टी विचारात घेऊन विविध प्रवर्गातील क्रमांक दिले जातात. 

ट्युशन फी वीव्हर स्कीम (टीएफडब्ल्यूएस) शासनाच्या इतर सवलतींसोबतच इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीएफडब्ल्यूएस ही अधिक सवलत देण्यात आली आहे. ही सवलत हवी असल्यास विद्यार्थ्याने अप्लिकेशन फॉर्म भरतानाच टीएफडब्ल्यूएस हवी का? या प्रश्नासमोर 'हो' असे नमूद करणं गरजेचं असेल. संविधानिक आरक्षण प्राप्त झालेल्या सर्व प्रवर्गांना फीमध्ये सवलत देण्यात आली आहे. मात्र खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदतीसह शिक्षण घ्यायचं असल्यास त्याच्यासाठी टीएफडब्ल्यूएस हा पर्याय निर्माण केला आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडे चार लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास विद्यार्थ्याला ही सवलत मिळू शकते. प्रत्येक कॉलेजांमधील पाच टक्के जागांसाठी ही सवलत उपलब्ध आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑप्शन फॉर्म भरताना या जागांसाठी विशेष कोड देण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांनी या सवलतीचा निश्चितपणे विचार करावा. 

चुका करणं टाळा. अप्लिकेशन फॉर्म भरताना काही चूक झाल्यास विद्यार्थ्यांना ती चूक एआरसी येथे जाऊन दुरूस्त करण्याची सोय आहे. मात्र ऑप्शन फॉर्म भरताना चूक झाल्यास ती दुरुस्त करता येणार नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म फार काळजीपूर्वक भरावा. एका कागदावर विद्यार्थ्यांनी सर्व चॉइस कोड प्राधान्य क्रमाने लिहून काढावे आणि ऑप्शन फॉर्म भरताना ते जसेच्या तसे उतरवावे. असं केल्यास चुक टाळणं सहज शक्य आहे. 

प्राधान्यक्रम बदलू नका. इंजिनीअरिंग प्रवेशातील तीनही कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे चॉइस कोड भरू नयेत. प्राधान्यक्रम विचारपूर्वक तयार केलेला असल्याने पुढील कॅप राऊंडसाठी सुद्धा तोच प्राधान्यक्रम वापरा. त्यामुळे प्रत्येक कॅप राऊंडमध्ये अधिक चांगलं कॉलेज उपलब्ध होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा एकदा तयार केलेला प्राधान्य क्रम कोणत्याही कारणामुळे बदलू नका. 

नामांकित कॉलेजांना प्राधान्य द्या. आपला एसएमएल क्रमांक, मागील वर्षाची कट ऑफ, कॉलेजने केलेले जागा वाटप पाहून विद्यार्थ्यांनी आपले प्राधान्यक्रम ठरवावेत. आपला एसएमएल क्रमांक चांगला असेल तर विद्यार्थ्यांनी नामांकित कॉलेजांना प्राधान्य द्यावं. चांगले पर्याय समोर ठेवल्यास चांगले कॉलेज उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. मात्र विद्यार्थ्यांनी स्वत:हून कमी दर्जाच्या कॉलेजांचे पर्याय देऊ नयेत. 

कॅप राऊंड 

इंजिनीअरिंग प्रवेशातील टप्प्यांना कॅप राऊंड म्हणतात. असे चार टप्पे इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत. पहिल्या तीन टप्प्यांसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं असतं. विद्यार्थी कमीत कमी एक ते जास्तीत जास्त शंभर पर्याय या ऑप्शन फॉर्ममध्ये देऊ शकतात. पहिल्या कॅप राऊंडमध्ये दिलेल्या प्राधान्य क्रमातील पहिले कॉलेज उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं, बंधनकारक आहे. दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये दिलेल्या प्राधान्य क्रमातील पहिल्या तीन कॉलेजांपैकी एखादं कॉलेज उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या कॉलेज मध्ये प्रवेश घेणं, बंधनकारक आहे. तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये दिलेल्या प्राधान्य क्रमातील पहिल्या सात कॉलेजांपैकी एखादे कॉलेज उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्याला त्या कॉलेज मध्ये प्रवेश घेणं, बंधनकारक आहे. कॅप राऊंडमध्ये उपलब्ध झालेल्या कॉलेजमध्ये दिलेल्या वेळेत प्रवेश निश्चित केल्यास विद्यार्थी पुढील कॅप राऊंडसाठी विचारात घेतला जातो. तीनही कॅप राऊंडनंतर मनासारखं कॉलेज उपलब्ध न झाल्यास रिक्त जागांसाठी चौथा टप्पा औरंगाबाद इथे घेतला जातो. या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणतंही आरक्षण विचारात घेतलं जात नाही. 

कॉलेज निवडताना... इंजिनीअरिंग कॉलेजची वेळ साधारणतः ९ ते ४:३० अशी असते. तेव्हा येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोयीचं कॉलेज विद्यार्थ्यांनी निवडावं. जेणेकरून प्रवासाचा वेळ वाचेल आणि अभ्यासासाठी मुबलक वेळ उपलब्ध होईल. गेल्या वर्षी किती विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट सेलच्या सहाय्याने नोकरी उपलब्ध झाली, हे पाहून विद्यार्थ्याने कॉलेज निवडावे. हे पाहताना कंपनी, मिळालेल्या नोकरीचे स्वरूप, मिळालेले पॅकेज यांचा विचार करावा. आपण निवडत असलेल्या कॉलेजमधील स्टाफ किती चांगला आहे, यावर तिथे शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडून मत घेऊ शकतो. शिवाय त्यांचं शिक्षण, शिकवण्याची पद्धत हे तपासून आपण कॉलेज निवडू शकतो. 

शाखा निवडताना... इंजिनीअरिंगची शाखा निवडताना आपल्याला त्या शाखेत आयुष्यभर काम करायचं आहे, हे विसरता कामा नये. शाखा निवडताना आपल्या आवडत्या शाखेची सविस्तर माहिती घ्या. अनेक घरांत वडिलोपार्जित व्यवसाय असतात. वडीलांच्या व्यवसायाला हातभार लागावा. म्हणून अनेक विद्यार्थी आपल्या व्यवसायाशी संबंधित शाखा निवडतात. इंजिनीअरिंगकडे वळताना अनेक विद्यार्थी अमुक एखाद्या आवडत्या शाखेत प्रवेश हवा, म्हणूनच इंजिनीअरिंग शिकण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लोकांकडून त्या शाखेची माहिती घ्यावी. पण स्वतःची आवड जपत योग्य शाखेची निवड करावी. 

मेकॅनिकल कोणी घ्यावं? इंजिनीअरिंगकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा मेकॅनिकल हीच शाखा हवी असते. टीम वर्क करताना तुम्ही सर्वांमध्ये मिळून मिसळून राहू शकत असाल. तरच मेकॅनिकल शाखा निवडा. जर 'मी बरा आणि माझं काम बरं' असा तुमचा दृष्टीकोन असेल, तर मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेऊ नका. कम्प्युटर आणि आयटी शाखेत जाणारे विद्यार्थी एका ठिकाणी एकटं बसून आपलं काम करू शकतात. खूप अभ्यास करू शकत असाल, स्वतःला अपडेटेड ठेवू शकत असाल, कम्प्युटर आणि आयटी उत्तम पर्याय आहे. कोणत्याही शाखेचा वेडा हट्ट धरू नका. तुमच्या अभ्यासानुसार, स्वभावानुसार तुम्हाला झेपेल, अशीच शाखा निवडा. 

एकसारखी नावं असलेल्या शाखा प्रत्येक पारंपरिक शाखेसह अनेक समान नावं तसेच समान अभ्यासक्रम असलेल्या शाखा आहेत. इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक शाखांकडे असतो. विद्यार्थ्यांनी या पारंपरिक शाखांसाठी अडून न राहता समान अभ्यासक्रम असलेल्या इतर शाखांचाही विचार करावा. 

ऑप्शन फॉर्म भरताना... चॉइस कोड समजून घ्या. ऑप्शन फॉर्ममध्ये चॉइस कोड भरण्यापूर्वी चॉइस कोड म्हणजे नक्की काय भानगड आहे, हे नीट समजून घ्या. चॉइस कोड कसा तयार होतो, हे समजून घेतल्यास विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका सहज टाळू शकतात. चॉइस कोड आठ अंकी असतो. आठ अंकी चॉइस कोड मधील पहिले चार अंक म्हणजे तुम्ही निवडलेल्या कॉलेजचा कॉलेज कोड असतो. प्रत्येक कॉलेजचा कॉलेजकोड वेगळा असतो. कॉलेजकोड नंतरचे तीन अंक तुम्ही निवडलेली शाखा दर्शवितात. प्रत्येक शाखेसाठी हा तीन अंकी कोड वेगळा असतो. चार अंकी कॉलेजकोड आणि तीन अंकी शाखेचा कोड यानंतर चॉइस कोडमधील उर्वरित एक अंक तुम्ही निवडत असलेल्या शाखेची शिफ्ट दर्शवितात. साधारणतः इंजिनीअरिंगचं शिक्षण दोन शिफ्टमध्ये चालतं. मुंबईमध्ये मात्र अनेक कॉलेजांमध्ये एकच शिफ्ट चालते. एखाद्या कॉलेजच्या एखाद्या शाखेसाठी टीएफडब्ल्यूएस चा पर्याय उपलब्ध असल्यास आठ अंकी चॉइस कोड नंतर (T) हे इंग्रजी अक्षर लावलं जातं. टीएफडब्ल्यूएस चा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी (T) हे इंग्रजी अक्षर असलेले चॉइस कोड ऑप्शन फॉर्म मध्ये भरावेत. असे चॉइस कोड ऑप्शन फॉर्ममध्ये भरले असल्यास विद्यार्थ्यांना टीएफडब्ल्यूएसचा लाभ घेता येईल. ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळता याव्या यासाठी चॉइस कोड कसा तयार होतो, हे वर सांगितलं आहे. मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःचे चॉइस कोड तयार न करता उपलब्ध चॉइस कोडचा वापर करावा. (चॉइस कोड....61793721T, 69813362) 

आरक्षण समजून घ्या. 

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत, हे ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी तपासून घेतल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश कुठे मिळू शकतो, आणि कुठे नाही, याचा अंदाज येईल. तेव्हा विद्यार्थ्यांनी आरक्षण समजून घेणं महत्त्वाचं आहे. एखाद्या कॉलेजमधील, एखाद्या शाखेत, एखाद्या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत, याची तपशीलवार यादी डीटीईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ही यादी पाहून त्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न साडे चार लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास विद्यार्थ्याला टीएफडब्ल्यूएस ही सवलत मिळू शकते. प्रत्येक कॉलेजांमधील पाच टक्के जागांसाठी ही सवलत उपलब्ध आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑप्शन फॉर्म भरताना या जागांसाठी विशेष कोड देण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांनी या सवलतीचा निश्चितपणे विचार करावा. जेईईमध्ये पॉझिटीव्ह स्कोअर केलेल्या (शुन्याहून अधिक गुण मिळवलेल्या) प्रत्येक विद्यार्थ्याने अप्लिकेशन फॉर्म भरताना ऑल इंडिया कोटा (AIR) यासाठी अर्ज करायचा आहे का? असे विचारले असता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी 'हो' हेच उत्तर द्यावं. या कोट्यासाठी सर्व कॉलेजांमध्ये १५ टक्के जागा आरक्षित आहेत. अल्पसंख्यांक समूहाच्या कॉलेजमध्ये ५१ टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी, २० टक्के मॅनेजमेंट कोट्यासाठी तर उर्वरित २९ टक्के इतरांसाठी आरक्षित असतात. इथे इतर कोणतंही आरक्षण लागू होत नाही. होम युनिव्हर्सिटी (HU) म्हणजेच मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील ७० टक्के जागा आरक्षित आहेत. तर उर्वरित ३० टक्के जागा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी (OHU) म्हणजेच मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील ३० टक्के जागा मुलींसाठी आरक्षित आहेत. 

ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना याच प्रवेश प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. मात्र ऑटोनॉमस कॉलेजांमध्ये वरील कोणतंही आरक्षण लागू होत नाही. तिथे प्रवेश फक्त मेरिटनुसार दिला जातो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजमधील जागा वाटप पाहूनच ऑप्शन फॉर्म भरावा.